मुंबई – पुण्यातील कोथरुड येथे घुसलेल्या रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रानगव्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं. जवळपास पाच तासांच्या धावपळीनंतर गव्यावर नियंत्रण मिळवण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलं होतं. मात्र अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपला डिवचलं. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? अशी अप्रत्यक्ष टीका संजय राऊतांनी केली.
एका गव्यास पुणेकरांनी मारून दाखवले. पुणेकरांनी हेसुद्धा करून दाखवलं. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणतील, गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच! पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? पुणे तिथे काय उणे!, असे संजय राऊतांनी अग्रलेखात म्हटलं आहे.