प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात सोमवारी पंढरपुरात मंदिरं खुली करण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलं. यावरुन शिवसेनेने भाष्य केलं असून कपाळास बुक्का, चंदन लावून अॅड. आंबेडकर मंदिरात गेले. एक प्रकारे त्यांनी भगवी पताकाच खांद्यावर घेतली असं म्हटलं आहे. पोलिसांनी लाठी जरी उगारली तरी वातावरण बिघडवायचेच हा डाव उधळला गेला असा दावाही शिवसेनेने केला आहे.
प्रकाश आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतच करावे लागेल असं शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून म्हटलं आहे.
सरकारच्या मनात कोरोनासंदर्भात भीती आहे व ती रास्त आहे. इतके असूनही अॅड. प्रकाश आंबेडकर व त्यांच्या पंधरा सहकाऱ्यांना विठ्ठल मंदिरात जाऊन माऊलीचे दर्शन घेण्याची परवानगी दिली. अॅड. आंबेडकरांनी ‘नामदेव पायरी’चेही दर्शन घेतल्याचे समजते. देह विसर्जन करण्यासाठी नामदेव पंढरीला आले आणि विठ्ठलाच्या महाद्वारी त्यांनी समाधी घेतली. तीच ‘नामदेवाची पायरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलीचे दर्शन घेऊन केला असं शिवसेनेने म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठाई माऊली आहे. जनतेचा, सरकारचा माऊलीशी थेट संबंध आहे. त्यामुळे जे लोक आज मंदिरात घुसण्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांनी सरकार व देवांत भांडण लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. जगात भांडल्यावाचून काही मिळत नाही. परमेश्वराशीदेखील भक्ताला भांडावे लागले; पण इथे सरकारविरोधी पुढारीच मंदिराबाहेर उभे राहून भक्तांना भांडण्याचे उत्तेजन देत आहेत अशी टीका शिवसेनेने केली आहे.
दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने मंदिरे उघडण्यासाठी जागोजाग घंटानाद आंदोलन केले व आता वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवेशासाठी मोठे आंदोलन केले व अखेर सरकारी हस्तक्षेपाने त्यांनी मंदिरात प्रवेश मिळवला. मंदिरांसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनाचा संबंध भाजपच्या घंटानादाशी जोडला जातो, हा निव्वळ योगायोग समजायला हवा. अॅड. आंबेडकर व भाजपचे आतून साटेलोटे आहे, असा आरोप नेहमी केला जातो. त्यात काही तथ्य असावे असे वाटत नाही. लोक दहा तोंडांनी बोलतात व शंभर कानांनी ऐकतात त्याला इलाज नाही असं शिवसेनेने सांगितलं आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा हट्ट असा आहे की, ‘नियम मोडीन, पण मंदिरात जाईन. मंदिराचे दरवाजे उघडा. मी येथे नियम मोडण्यासाठीच आलो आहे.’ कायद्याची जाण असलेल्या अॅड. आंबेडकरांसारख्या व्यक्तीने कायद्याचे पालन करणार नाही अशी भाषा वापरणे योग्य नाही. मंदिरे उघडा ही जनतेची मागणी आहे, असे आता अॅड. आंबेडकर सांगत आहेत. जनतेची मागणी आहे हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे.
पण मंदिरे उघडणार नाहीत किंवा मंदिरात कोणाला प्रवेश दिला जाणार नाही असे कधीच कोणी जाहीर केलेले नाही. मंदिरे उघडण्याची ही वेळ नाही इतकेच सरकारने सांगितले असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे.
अॅड. आंबेडकरांनी पंढरपुरात गर्दी जमवली व ती गर्दी मंदिरासमोरचे बॅरिकेडस् तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी पोलिसांनी कोणताही बलप्रयोग केला नाही. पोलिसांनी संयम राखला हे महत्त्वाचे. पोलिसांनी लाठी जरी उगारली तरी वातावरण बिघडवायचेच हा डाव त्यामुळे उधळला गेला असा दावा शिवसेनेने केला आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर हे बौद्ध धर्माचे उपासक आहेत, पण राज्यातील बहुजन वंचित आघाडीचे नेतृत्व ते करतात. जे देश बौद्धधर्मीय आहेत त्या देशांतही बौद्ध प्रार्थनास्थळांत लोकांना प्रवेश नाही अशी स्थिती आहे. प्रकाश आंबेडकर यांना जनतेचे प्रश्न समजतात व वारे कोणत्या दिशेला वाहतात हेसुद्धा समजते. मंदिरे उघडा ही लोकभावनाच आहे हे जसे अॅड. आंबेडकरांना समजते तसे सरकारलाही समजत असावे व कोणतेही सरकार लोकभावनेला चिरडू शकत नाही. तरीही विरोधक बेबंद वागतात तसे सरकारला वागता येत नाही असं शिवसेनेने म्हटलं आहे.