मुंबई : काही ठराविक लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्री बदनाम होत असल्याचं ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “ही इंडस्ट्री पाच लाख लोकांना नोकरी पुरवते. जर कोणी हे संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तिथेच रोखलं पाहिजे”.
काही लोक बॉलिवूडबद्दल अपप्रचार करत असून फक्त चित्रपटसृष्टीच नाही तर आपली संस्कृती, परंपरा यांचीही बदनामी करत असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्स रॅकेट चालत असल्याचं बोललं जात असून हे रोखण्याची जबाबदारी सरकार आणि लोकांची आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पुढे ते म्हणाले की, “काही ठराविक लोक इंडस्ट्रीबद्दल वाईट बोलत आहेत. फक्त इंडस्ट्रीच नाही तर आपली संस्कृती-परंपरा यांचीही बदनामी होत आहे. ते म्हणतात इथे ड्रग्स रॅकेट चालतं. हा फक्त राजकीय किंवा इतर कोणत्या क्षेत्राचा भाग नाही ? हे थांबवण्याची जबाबदारी सरकार आणि लोकांची आहे”.
This is what Jaya Bachchan said, that industry is receiving a bad reputation due to only a few people. The industry provides jobs to 5 Lakh people, if someone is trying to finish this off, then they should be stopped: Sanjay Raut, Shiv Sena https://t.co/VgNnCJKFWA
— ANI (@ANI) September 15, 2020
काय म्हणाल्या होत्या जया बच्चन नेमकं
सभागृहात शून्य प्रहरामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोक बदनाम करत असल्याचं जया बच्चन यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं. “मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा”, असं त्या म्हणाल्या.