मुंबई : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. अनेक राज्यांमध्ये मतदारांनी स्थानिक पक्षाला कौल दिल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्वांत पश्चिम बंगालच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज करत भाजपचा दारूण पराभव केला आहे. यावर आता महाराष्ट्रातील नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया समोर येत आहे.
पश्चिम बंगालच्या निकालावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, एक स्त्री, एक जखमी वाघीण मैदानात उतरुन एकटी लढत होती, त्यांच्या पक्षाला उद्ध्वस्त केलं, नेत्यांना तोडलं, दबाव आणला, केंद्रीय यंत्रणांचा दवाब आणला. आपलेच लोक विरोधात उभे असतानाही बंगालची वाघीण मागे हटली नाही, लढत राहिली आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हे संपूर्ण देश आणि राजकारणासाठी प्रेरणादायी आहे.
एका स्त्रीने जिला आम्ही बंगालची वाघीण म्हणतो. ती निवडणुकीच्या काळात जखमी झाली. व्हिलचेअर फिरत होती. मात्र तिने बंगालमध्ये एकहाती विजय प्राप्त केला. हा विजय देशाच्या राजकारणाला दिशा देणारा आहे. बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल, असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला.
ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा दिल्लीतून येऊन कोणत्याही राज्यात दादागिरी सहन केली जाऊ शकत नाही हे दाखवलं आहे. मग ते महाराष्ट्र असो, दिल्ली असो किंवा मग पश्चिम बंगाल असो. तेथील जनता, प्रादेशिक पक्ष देशाचं राजकारण ठरवणार हा संदेश गेला आहे, असेही राऊत म्हणाले.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव स्विकारावा लागला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, निक राजकीय समीकरणानं हा पराभव झालाय. जो महाविकास आघाडीसाठी धक्का आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.