मुंबई : हिंदुत्वाशी काडीमात्र संबंध नसलेले भाजपमधील बाजारबुणगे आणि उपरे श्रेयवादाचा गोंधळ घालत आहेत. अशाने भाजपची पत वाढणार नसून ती उतारास लागत आहे याचे भान ठेवले नाही तर राज्यात त्यांचे हसे होईल, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून सांगण्यात आले आहे
‘सामना’तील या अग्रलेखात भाजप आमदार राम कदम, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांना नाव न घेता सणसणीत टोले लगावण्यात आले आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले. मात्र, सर्व श्रेय आमचेच, असा गोंधळ सुरु करुन भाजपमधील ‘उपऱ्यां’नी विजयोत्सव सुरु केला.
मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दारी हे उपरे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि नारे वैगैरे लावत पोहोचले. ज्यांचा भाजपशी किंवा हिंदुत्वाच्या विचारधारेशी काडीमात्र संबंध नव्हता असे बाजारबुणगे सत्तेसाठी भाजपमध्ये घुसले. ते उपरेच देवाच्या दारात श्रेयवादाचा गोंधळ घालत आहेत, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
कुणीतरी एक बोगस ‘आचार्य’ पुढे करुन मंदिरांचे टाळे उघडा यासाठी आंदोलन केले. कोण कुठले आचार्य? पण भाजपला फुकटात नाचायला लोक मिळतात. ते भाड्याने वापरुन महाराष्ट्र सरकारच्या नावाने शिमगा करायचा हा भाजपचा रिकाम्या वेळेतला उद्योग झाला आहे, असा टोलाही शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे.