बेळगाव जिल्हयातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला होता. यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर कर्नाटक सरकारने पुन्हा हा पुतळा बसवणार असल्याचे म्हटले आहे. आता या प्रकरणावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर तोफ डागली आहे.
कोणत्याही पक्षाचा आमदार किंवा मुख्यमंत्री हे छत्रपती शिवरायांपेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे कातडीबचाव फुटकळ खुलासे करण्यात अर्थ नाही. शिवरायांचा पुतळा रातोरात हटवण्याचा प्रकार चिंताजनक आहे. त्याहीपेक्षा महाराष्ट्रातील भाजप ‘शिवभक्तां’चे मौन चिंताजनक आहे, असं सांगतानाच तिकडे अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी रामजन्मभूमीवर शिवरायांचा जयजयकार करतात, पण कर्नाटकात जणू बाबरीच पाडल्याच्या ऐटीत शिवरायांचा पुतळा हटवला जातो. ही नकली शिवभक्ती काय कामाची? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, सध्याचे भाजपशासित राज्यकर्ते बोलतात एक व करतात दुसरेच. युगपुरुष, देवादिकांच्या नावाचा वापर ते राजकीय स्वार्थासाठीच करीत असतात. महाराष्ट्रातील मागच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजीराजांचे आशीर्वाद आपल्यालाच आहेत असा प्रचार त्यांनी केला, पण त्यांच्या कार्यकाळात शिवरायांच्या स्मारकाची वीट रचली गेली नाही. अशा अनेक सोंगाढोंगांच्या गोष्टी सांगता येतील. यांचे शिवरायप्रेम हे ढोंग आहे हे सिद्ध करणारी दुर्घटना बाजूच्या कर्नाटक राज्यात घडली आहे.
हिंदूंवरची सर्व आक्रमणे शिवरायांनी तलवारीच्या बळावर मोडून काढली हे सत्य अयोध्येत नरेंद्र मोदींनी स्वीकारले. म्हणूनच रामजन्मभूमीवर मंदिराचे भूमिपूजन करताना पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मनापासून स्मरण केले, पण पंतप्रधान छत्रपती शिवरायांपुढे नतमस्तक होतात व कर्नाटकात त्यांचे कानडी मावळे रात्रीच्या अंधारात शिवरायांचा पुतळा हटवतात याचा मेळ कसा लावायचा?
कर्नाटक सरकारचे सीमा भागातील मराठी बांधवांशी भांडण आहेच. ते राहीलच. मराठी बांधवांवर तेथे रोजच जुलूम, अत्याचार होत आहे, पण या भांडणाचा डंख त्यांनी शिवरायांवर काढून स्वतःचेच हसे करून घेतले, असे अग्रलेखात म्हटले आहे.