औरंगाबाद: आर्यन खान प्रकरण दिवसेंदिवस चिघळत आहे. महाराष्ट्र सरकार विरुद्ध एनसीबी, केंद्र सरकार असा संघर्ष जणू पाहायला मिळत आहे. आर्यन खान याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा पाय खोलात असल्याचे चित्र आता समोर आले आहे.
आता शिवसेना पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नवाब मलिक यांना पाठींबा दर्शविला आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे न्यायाची लढाई आहेत. संपूर्ण महाविकास आघाडी सरकारच्या वतीने लढत आहेत. त्यांना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठींबा दिला आहे.
आमच्या सारख्या लोकांना वाटतं आहे कि हे सर्व थांबावं मात्र जर भारतीय जनता पक्षाला शहाणपणा सुचत नसेल तर ही लढाई अशीच सुरु राहणार. माझ्या मते तर अजून काहीच समोर आलेलं नाही. नवाब मलिक यांचा इंटरव्हल लांबतोय आणि आता मी देखील त्यात एंट्री करणार आहे असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते औरंगाबादमध्ये बॊलत होते.
राऊत म्हणाले की भारतीय जनता पक्ष लढण्यासाठी कधीही स्वतःचे हत्यार वापरत नाही. त्याच्याकडे स्वतःच असं चांगलं हत्यारचं राहिलेलं नाही. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन निशाणा लावायची आता त्यांना सवय लागली आहे. ते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतात मात्र खांदेही पिचके असल्याने त्यांचा बार फुसका ठरतो. कधी ते बाँम्ब फोडणार असं म्हणतात तर कधी हा बॉम्ब, तो बॉम्ब फोडू असं देखील म्हणतात. मात्र त्याचा फटका एकदाही फुटलेला नाही. काही ते ईडी-सीबीआयची घोषणा करतात मात्र त्यांना तिथून देखील हाती काहीच लागत नाही.
भाड्यावर घेतलेले राजकीय पक्ष हाताशी धरून आमच्यावर टीका करतात, विरोध करतात. मात्र त्यांनी हे लक्षात घ्यावं की शिवसेना हत्ती आहे. हत्ती चालत असतो आणि चालताना तो कधीही भुकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष देत नाही आणि लक्ष देण्याचं कारणही नाही असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाला देखील टोला मारला आहे.