तुम्ही कोणत्याही विचारांचे, पक्षाचे अथवा कुठल्याही क्षेत्रातील असा, पण ज्या ज्यावेळी “जाणता राजा” या शब्दाचा उच्चार होतो, त्या वेळी एकच नाव अपसूकपणे पुढे येते, ते नाव कोणते? या प्रश्नाचे उत्तरही सांगण्याची गरज नसते! पण आज मी मात्र तुमच्याशी बोलतोय ते तेवढ्याच तोलामोलाच्या एका अष्टपैलू आणि तळागाळातून कार्यकर्ता म्हणून आलेल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल.. .. होय, मी, नितीन गडकरी यांच्याबद्दलच बोलतोय! माझ्यासारखे असंख्य सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे महाराष्ट्राचा “धाकला जाणता राजा” म्हणूनच आज पहात आहेत.
विद्यार्थी चळवळीतून अत्यंत प्रतिकूल राजकीय परिस्थितीतून उभा राहिलेला हा नेता! ते कुठल्यातरी पदावर आहेत म्हणून नव्हे, तर भव्यदिव्य,जगावेगळे, महत्त्वाकांक्षी आणि अनेकांना अशक्य वाटणारे काम साकार करण्याची इच्छाशक्ती आणि दृष्टी त्यांना आहे, म्हणूनच मराठी माणूस त्यांच्याकडे “धाकला जाणता राजा” म्हणून पाहतो आहे. व्यक्तिशः मला ही व्यक्ती विशेष आवडू लागली ती त्यांच्यावर स्वतःच्या पक्षातून आणि विरोधी पक्षातून ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना झालेल्या चौफेर हल्ल्यापासूनच! त्या संकट काळातही “आत एक आणि बाहेर दुसरेच” या बाजारबुणग्या विचाराला आपल्या जवळही फिरकू दिले नाही. मोठ्या हिमतीने आणि सडेतोडपणे त्यांनी त्या हल्ल्यांना काँग्रेस आघाडीचे सरकार असताना परतवून लावले!
पुणे-मुंबई महामार्ग असो देशातील रस्त्यांचे जाळे असो, अशा असंख्य विषयांना विषयांबद्दल सर्वसामान्य माणूस त्यांचे कौतुक करतो. त्या कौतुकाला पक्ष आणि तथाकथित तात्विक बैठकीच्या भिंती देखील रोखु रोखू शकत नाहीत… म्हणूनच शरद पवारांनंतर सर्वमान्य असलेला “धाकला जाणता राजा” असा केलेला उल्लेख सर्वांनाच आवडेल. चौकटीबाहेर जाऊन विचार करणे आणि त्याला वास्तववादाची जोड देणे, ही त्यांची कार्यपद्धती. या कार्यपद्धतीला राजकारण, विकास अथवा तत्त्व यांनादेखील त्यांनी कधी अपवाद ठरु दिले नाही… म्हणूनच धर्मनिरपेक्षता या विरोधकांच्या नेहमीच्या विषयाला त्यांनी आपले सर्वधर्म समभाव हे खणखणीत उत्तर तयार ठेवले. त्यांच्या आजवरच्या कामाबद्दल खूप खूप लिहिण्यासारखे आहे. पण मागच्या आठवड्यात त्यांनी कोरोना संकट आणि आजच्या वातावरणाच्या अनुषंगाने केलेले भाषण आज मला विशेष महत्वाचे वाटते. जर ते भाषण तुम्ही एकल नसेल तर आवर्जून ऐका. सर्वच विचारांच्या नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य माणूस आणि संपूर्ण समाजाला जागे करणारे असेच त्यांचे विचार आहेत. ते ऐकून तुम्हीही म्हणाल महाराष्ट्राचा “धाकला जाणता राजा”
राजा माने यांच्या विषयी
दैनिक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक म्हणून त्यांनी कार्य पाहिले आहे. दैनिक लोकमतच्या कोल्हापूर आणि कोकण विभागाचे संपादक म्हणून आणि अहमदनगर आवृत्ती प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. दैनिक एकमत आणि दैनिक सुराज्यचे संपादक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. दैनिक पुढारी आणि दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी कार्य पाहिले आहे. तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे (महाराष्ट्र) संस्थापक अध्यक्ष आहेत .
‘महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा’ हा चरित्रग्रंथ त्यांनी लिहिला आहे. ‘अग्निपंख’ हा दैनिक एकमत मधील निवडक अग्रेलेखांचा संग्रह प्रसिध्द आहे. ‘लेक माझी लाडकी’, ‘गुरुजन’, ‘उगवतीचे रंग’,‘चारुकीर्तीवाणी’ ही त्यांची पुस्तकेही प्रसिध्द आहेत.
राजा माने यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे, यात महाराष्ट्र शासनाचा विकास वार्ता पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अग्रलेखनासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचा कै. काकासाहेब खाडिलकर पुरस्कार, कै. बाबा दळवी शोधपत्रकारिता पुरस्कार आदींचा समावेश आहे.