पिंपरी चिंचवड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळ लोकसभेसाठी विद्यमान खासदार ,श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि त्यांच्याच पक्षाचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनीही मावळची जागा पक्षाने लढवण्याची मागणी केली आहे. यामुळे बारणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. यातच आता भाजपकडूनही या जागेवर दावा सांगितल्यानंतर श्रीरंग बारणे यांचं पाय आणखी खोलात गेलं आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेपेक्षा भाजपचीच ताकद अधिक असल्याने ही जागा पक्षाकडेच राहावी अशी मागणी आता भाजपच्या कोअर कमिटीच्या लोणावळा येथील बैठकीत आक्रमकपणे करण्यात आली. यातच याठिकाणी आयात उमेदवार न देता पक्षाचाच असावा असा आग्रह देखील धरण्यात आलाय. पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मतदारसंघात शिवसेनेपेक्षा भाजपची किती ताकद आणि कशी ताकद जास्त आहे. हे तेथे पक्षाचे आमदार आणि नगरसेवकांच्या संख्या सांगत समप्रमाणात दाखवून दिले.
दरम्यान, मावळच्या जागेवर राष्ट्रवादी बरोबर आता भाजपनेही दावा सांगिल्याने बारणेंच्या अडचणीत आखणी वाढ झाली आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात आता नेमकी कुणाला उमेदवारी देतात. त्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. यातच अशी माहिती देखील समोर येत आहे की, भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत तीस पेक्षा अधिक जागा लढविणार आहे. त्यामुळे मावळची जागा शिंदे गटाला मिळणे अवघड झाले आहेत.