मुंबई : महाराष्ट्र सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय २० एप्रिल रोजी घेतला होता. या निर्णयाला पुण्यातील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असून पुढील दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील रविवारी पत्रकारांशी बोलताना कोरोनाची तिसरी लाट आणि विद्यार्थी, शिक्षकांच्या सुरक्षेचा विचार करता दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार नाही, असं देखील म्हटलं होतं.
महाराष्ट्र सरकारनं कोरोना परिस्थितीचा विचार करुन दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेकप्रकरणी आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर परिणाम होत आहे. ही बाब न्यायालयासमोर मांडणार आहोत. सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती असाधारण परिस्थिती आहे. इंटरनेट आणि इतर समस्यांमुळे ऑनलाईन परीक्षेचा विचार करता येत नाही. यामुळे दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.
महाराष्ट्राच्या बोर्डाची बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख आहे. तर, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या २५ हजार आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना सुरक्षित वातावरणात केली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करताना लसीकरण हा महत्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यासाठी पुढाकार केंद्रानं पुढाकार घ्यावा, अशी मागणी उच्चस्तरीय बैठकी केल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. सीबीएसईनं यापूर्वी बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकताना १ जूनला निर्णय जाहीर करु असं म्हटलं होतं. त्यावेळी विद्यार्थ्यांना १५ दिवस अभ्यासासाठी वेळ दिला जाईल, असं देखील सांगितलं गेलं होतं. त्यामुळे बारावीच्या परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील होऊ शकतात.