“राजसाहेब मला माफ करा, आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टींवर राजकारण चालते आणि दोन्ही गोष्टी आमच्याकडे नाहीत, त्यामुळे मी जीवन संपवत आहे,’ अशा भावना मांडणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहित सुनील ईरावार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोबाईल कॉल करून मनसैनिक सुनील ईरावर यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर देत त्यांचे सांत्वन केले.
पक्षाचे किनवट शहर प्रमुख गेल्याचे दुःख व्यक्त करत राज ठाकरे यांनी सोमवारी मृत सुनील यांचे बंधू अनिल ईरावार यांच्याशी संवाद साधला. आत्महत्या करण्यापूर्वी सुनीलने मला बोलायला हवं होतं, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. मी आपल्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी येईन, काळजी करू नका, असा शब्दांत राज ठाकरे यांनी ईरावर कुटुंबास धीर दिला.
ग्राम विकास, स्वच्छता, गोरगरिबांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, अशा विविध सामाजिक उपक्रमात सुनील ईरावार यांचा पुढाकार असायचा. भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेचेही त्यांनी काम केले आहे. त्यांचा सुस्वभाव व कार्यकर्त्यांशी आपुलकीची वागणूक यामुळे त्यांच्या भवती कायम तरुणांचा घोळका असायचा. यानंतर कार्यकर्त्यांनो, आत्महत्या करु नका, माझ्याशी थेट बोला, असे आवाहनही राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना केले आहे.