सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असताना बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यामध्ये संघर्ष होत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे वृत्त देखील समोर आले होते मात्र ‘सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण अद्याप सीबीआयकडे गेलेलं नाही. प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारकडून करण्यात आलेली सीबीआय चौकशीची शिफारस केंद्र सरकारने मान्य केलेली आहे .मात्र ११ तारखेला यासंदर्भात निकाल येईल. मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरु आहे आणि त्यासाठी ते सक्षम देखील आहेत. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास कोणतेही कारण नाही’, अशी प्रतिक्रीया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
सुशांतने १४ जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतने मानसिक दबावाखाली आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यावर मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीने चौकशी केली आहे. या चौकशी दरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर अनेक आरोप केल्यामुळे ही चौकशी झाली असून रियासोबत तिचे वडील आणि भाऊ यांचीही चौकशी करण्यात आली आहे.