सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपकडून वारंवार निशाणा साधला जात आहे. शिवसेनेकडून वारंवार आदित्य ठाकरे यांचा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला थेट आव्हान दिलं आहे.
सुशांत सिंग प्रकरण सीबीआयकडे देता मग न्यायाधीश लोया आणि भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करावी अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटणार आहे.एका मराठी वृत्तवाहिनीवर बोलताना सावंत यांनी ही मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणालेत अरविंद सावंत
सीबीआय चौकशी कधीही करता येते असं नाही.
राज्य सरकारने याबाबत केंद्राकडे शिफारस करावी लागते.
सीबीआय चौकशी लावण्याचीही काही प्रक्रिया आहे.
लोकशाहीचे नियम डावलून कुणीही चौकशी करु शकत नाही,
त्यामुळे सुशांत प्रकरणात जसं सीबीआय चौकशी करताय तसं गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया प्रकरणात सीबीआय चौकशी करावी, सत्य बाहेर येऊ द्या असं अरविंद सावंत यांनी एका मराठी वृत्त वाहिनीच्या चर्चेत वक्तव्य केलं आहे.
तसेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा बिहार पोलिसांचा काय संबंध आहे ? मुंबई पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. बिहार सरकारच्या सांगण्यावरुन सीबीआयकडे तपास सोपवावा हे गरजेचे नाही. या प्रकारामुळे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण होत आहे. काही लोक सुशांत प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणीही उठावं आणि सीबीआय चौकशी लावावी असं झालं तर याला काही अर्थ नाही. देशाच्या संविधानालाच धक्का देणार का ? अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपावर केली आहे.