औरंगाबाद : सरकारने हळूहळू लॉकडाऊन शिथिल करायला सुरुवात केली आहे. मात्र अद्याप प्रार्थनास्थळे सुरु करण्यात आलेली नाहीत त्याच अनुषंगाने विरोधकांकडून सरकारवर वारंवार निशाणा साधला जात आहे.’मंदिर आणि मशीद ही कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही. राज्य सरकार निर्देश देईल तेव्हा आम्ही मंदिरं सुरू करू,’ असा टोला शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना लगावला आहे.
मंदिर-मशिदी उघडण्याची मागणी करणारी एमआयएम त्यामुळं आक्रमक झाली आहे. राज्य सरकारनं १ सप्टेंबरला मंदिरं खुली करावीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मशिदी उघडू, अशी मागणी खासदार जलील यांनी केली होती. मात्र, सरकारनं ठोस निर्णय न घेतल्यानं एमआयएमने आता पुजाऱ्यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मशिदींसाठी उद्यापासून मोहीम सुरू केली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी जलील यांच्यावर टीका केली आहे. ‘मंदिरे उघडण्याची मागणी हा जलील यांचा राजकीय स्टंट आहे,’ असं दानवे यांनी म्हटलं आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. प्रत्येक टप्प्यात अधिकाधिक सवलती दिल्या जात आहेत. चौथ्या टप्प्यातील सवलती सोमवारी राज्य सरकारनं जाहीर केल्या. त्यात ई पास रद्द केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. तसेच मंदिरं उघडण्याची नियमावली बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.