मुंबई : राज्यात गेल्या 2 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात करोना बाधित रुग्णांची नोंद होत असल्यामुळे, राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत. राज्यात ५ एप्रिपासून नवीन करोना प्रतिबंधक नियमावली लागू केली गेली आहे. परंतु, या नियमावलीमुळे सामान्य जनतेचे जीवनचक्र पुन्हा मंदावले असून, नवीन नियमांना घेऊन, नागरिकांमधून देखील संमिश्र भावना उमटत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच अनेक क्षेत्रांवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी, राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती सरकारला केली होती. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी भ्रमणध्वनी (फोन)द्वारे संवाद साधून, एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंतीवजा मागणी केली होती.
दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज व्हर्च्युअल बैठक बोलावली होती. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री एकनाथ शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांचा देखील सहभाग होता. या बैठकीनंतर सरकारने आता, राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय जाहीर केला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे अनिश्चिततेच्या सावटाखाली परीक्षेला बसलेल्या विध्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, गेल्या कित्येक दिवसांपासूनच्या एमपीएससी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी लावून धरलेल्या मागणीला यश आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या असल्या, तरी पुढील वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाहीये.