मुंबई: फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोकमधून केंद्रावर आसूड ओढलेत. देश उलथवून टाकण्याच्या कटात म्हणे हा म्हातारा सामील होता. कोणता देश? कोणाचा देश? सत्य तरी काय आहे? ८४ वर्षांचा एक गलितगात्र देश उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय?, असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
अखेर फादर स्टॅन स्वामी हा ८४ वर्षांचा म्हातारा पोलीस कोठडीतच मरण पावला. फाशीवर जाणाऱ्यांनाही शेवटची इच्छा विचारली जाते. फादरला तो अधिकारही मिळाला नाही. देश उलथवून टाकण्याच्या कटात म्हणे हा म्हातारा सामील होता. कोणता देश? कोणाचा देश? सत्य तरी काय आहे?”, अशा शब्दात राऊतांनी संताप व्यक्त करत केंद्रावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
आजचे सरकार ८४-८५ वर्षांच्या फादर स्टॅन स्वामी, वरवरा राव यांना घाबरलंय
आजचे सरकार ८४-८५ वर्षांच्या फादर स्टॅन स्वामी, वरवरा राव यांना घाबरले आहे. स्टॅन स्वामींची तर तुरुंगात हत्याच झाली व नव्वदीतले वरवरा राव हे तुरुंगातच जीवनाशी झुंज देत आहेत. ”फादर स्टॅन स्वामींचे निधन यातनादायी आहे. पोलीस यंत्रणा आणि न्यायालयाच्या कार्यपद्धतीने मी निराश झालो आहे.” असे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकुर यांनी म्हटले आहे. जगभरातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी ८४ वर्षांच्या स्टॅन स्वामींना जामीन द्यावा यासाठी विनंती केली. जर्मनीच्या मानवाधिकार आयुक्तांनी, संयुक्त राष्ट्रानेही विनवणी केली. पण पाण्याचा ग्लास उचलून तोंडासही लावू न शकणाऱ्या फादर स्वामींना शेवटी तुरुंगातच मारण्यात आले.
…ते सरकार वृत्तीने हुकूमशाही, पण मनाने दुर्बलच असते!
‘मुस्कटदाबी’चे प्रयोग गेल्या सहा-सात वर्षांत अनेकदा झाले. ते फसले. फादर स्टॅन स्वामींवरील अन्यायाच्या प्रकरणी अनेक विचारवंत, पत्रकार, लेखक व कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. त्याला प्रसिद्धी मिळाली. म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. पण इतक्या लोकांनी आवाज उठवून, विनवण्या करून सरकारला पाझर फुटला नाही व फादर स्टॅन स्वामी तुरुंगातच मेले. हीच मुस्कटदाबी आहे. जे सरकार 84 वर्षांच्या अपंग, दुबळयास घाबरते ते सरकार वृत्तीने हुकूमशाही, पण मनाने दुर्बलच असते. हिटलर-मुसोलिनी तसेच होते! मग ते सरकार कोणाचेही असो!