बेळगाव : एकीकडे पंढरपूरात विधानसभेची पोटनिवडणूक ऐन रंगात असताना, तिकडे बेळगावात देखील लोकसभा पोटनिवडणुकीचा धुरळा उडत आहे. भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या १७ एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून २ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
मात्र त्याआधीच बेळगावातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून माघार घेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बेळगाव मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरूवात. संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले..सभा होणारच!गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय.
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 14, 2021
दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी आज संजय राऊत हे बेळगावात दाखल झाले असून, बेळगावात ही शिवसेनेची तोफ धडाडणार आहे. आज संध्याकाळी साडे सात वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार इथं ही सभा होणार आहे. मात्र त्यांच्या सभेची बेळगाव प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
कारण, सभेची आणि साऊंड सिस्टिमची रितसर परवानगी घेतली असताना, बेळगाव प्रशासनाने स्टेज, माईक तोडले असून हे लोकशाहीच्या, निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसतं? असा सवाल संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला विचारलेला आहे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समीतीचे उमेदवार दर्शन शेळके यांनी जोरदार मुसंडी मारली आहे शिवसेचा त्यांना पाठिंबा आहे. मी स्वतः त्यांच्या प्रचारासाठी 14 तारखेला बेळगावला पोहोचत आहे..
जय महाराष्ट्र pic.twitter.com/OvuBrq3DK5— Sanjay Raut (@rautsanjay61) April 12, 2021
तसेच संजय राऊत यांनी, “बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरुवात. संयुक्त महाराष्ट्र चौकातील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले..सभा होणारच! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय”, असं ट्विट करत बेळगाव प्रशासनाला कडक शब्दात इशारा दिला आहे.
भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला.