मुंबई : ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेली शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावत मोठा निर्णय दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील १६ आमदारांना पात्र ठरवण्यात आलं आहे. तसेच खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा मोठा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यावरून आता राज्यातून खोचक प्रतिक्रिया समोर येत आहे.
शिवसेना अपात्र आमदारांच्या निकालावर आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यापुढे कायदेशीर लढाई करणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. तर २०२४ ला भाजपला संविधान बदलायचं आहे. अशी सडकून टिका आदित्य ठाकरे यांनी केलीय.
दरम्यान, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिल्याने धुळ्यात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल जाहीर केल्यानंतर धुळ्यात राहुल नार्वेकर यांचा लोकशाहीचा खुनी अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे.