मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांचा उद्रेक होत आहे. सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधितांची रुग्णसंख्या ५० ते ५५ हजारांवर जात आहे. परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, तसेच काल झालेल्या टास्क फोर्स सोबतच्या बैठकीत, राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यात ७ किंवा १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात ७ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचार करत आहेत. मात्र मला दोन आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा वाटतोय. तसेच राज्यात कडक लॉकडाऊन न केल्यास आणि लोक भीती न बाळगता घराबाहेर पडत राहिल्यास राज्यात मृत्यूंचा खच पडेल, असा गंभीर इशारा दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असून, रविवारी राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक करोना बाधित रुग्णांची नोंद झाली. रविवारी महाराष्ट्रात ६३ हजार २९४ करोनाचे रुग्ण सापडले. तसेच राज्यात आतापर्यंत ३४ लाख ०७ हजार २४५ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
दुसरीकडे देशातही करोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली असून, गेल्या २४ तासांत देशामध्ये करोनाचे तब्बल १ लाख ६८ हजार ९१२ रुग्ण सापडले आहेत, तर ७५ हजार ८६ जणांनी करोनावर मात केली आहे, तर दिवसभरात ९०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.