पुणे : महाराष्ट्रात अनेक अतृप्त आत्मे फिरत आहेत. जे घर अस्थिर करतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एका नेत्यांमुळे आज राज्य अस्थिर झाले आहे. सुमारे 45 वर्षांपूर्वी 1995 मध्ये देखील त्यांनी शिवसेना – भाजपच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. केवळ राज्य नव्हे तर आपला पक्ष देखील यांनी अस्थिर केला. त्यामुळे राज्याचे अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ देखील पूर्ण करू शकले नाही, अशी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली.
महायुतीचे बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यातील रेसकोर्स मैदानावर महायुतीची एकत्रित प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मनसेचे अमित ठाकरे, भाजपचे चंद्रकांत पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
“शौर्य, “कर्म आणि पुण्य भूमीला माझा नमस्कार. कसे आहात पुणेकर”, अशा खास मराठी भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. नरेंद्र मोदी म्हणाले, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले असे अनेक संत, समाज सुधारक या भूमीने जगाला दिले आहे. पुणे हे बुद्धिवंत नागरिकांची नगरी आहे. आजचा भारत तरूण व तरूणांच्या बुद्धीमततेवर विश्वास ठेवून तंत्रज्ञानाच्या जोडीने पुढे विकास करत आहे. अनेक स्टार्ट उप हे आपल्या पुण्यात आहेत. महायुतीच्या सरकारने संशोधन करणाऱ्या तरुणांना एक लाखांचे अनुदान देण्याचे ठरवले आहे. FDI, निर्यात आणि संशोधन क्षेत्रात भारत अग्रेसर आहे. लवकरच भारत इलेक्ट्रिक व्हेईकल हब करणार असल्याचा देखील मोदी यांनी यावेळी सांगितले.
बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करणार, ही माझी गॅरंटी
मोदी म्हणाले, भारतात रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म या तत्वावर मोदी सरकार चालते. मात्र, कॉँग्रेसच्या 60 वर्षांच्या काळात सामान्य नागरिकांकडे मूलभूत सुविधा देखील नव्हत्या. मात्र आम्ही केवळ 10 वर्षांतच मोदीं सरकारने मूलभूत सेवा तर दिल्याच शिवाय विकासही केला. पालखी मार्ग, वंदे भारत ट्रेन, समृद्धी महामार्ग ही विकासाची प्रतीक आहे. अन् लवकरच तुम्ही देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करणार, ही माझी गॅरंटी आहे. 2014 पूर्वी भारतात मोबाईल आयात करावे लागायचे. मात्र, आता भारत निर्यात क्षेत्रात जगातील दोन नंबरचा देश ठरला आहे. 2014 नंतर आम्ही भ्रष्टाचार आणि महागाई यांच्यावर नियंत्रण मिळविले आहे.
70 वर्षा वरील ज्येष्ठ व्यक्तींवर मोफत उपचार
रस्त्यावरील विक्रेते, टपरी वायले हे मोदी सरकार आल्यापासून आलेले नाहीत. पण त्यांना मोदी सरकारने विना गॅरंटी कर्ज देण्याची सुविधा सुरू केली. सबका साथ सबका विकास ही मोदी सरकारची नीती आहे. आपण आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या औषध उपचाराची जबाबदारी घेतो. आता 70 वर्षा वरील ज्येष्ठ व्यक्तीच्या उपचारांची जबाबदारी मोदीची असेल, अशी खात्री देखील त्यांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, कॉँग्रेस ने धर्माच्या नावाखाली नागरिकांना आरक्षण दिले. मात्र मोदी सरकार धर्माच्या नावाखाली नागरिकांना आरक्षण देणार नाही. तसेच मी जीवंत असे पर्यंत कॉँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, असे आश्वासन देखील नागरिकांना दिले.