श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. पार्थ पवारांबाबत आजोबा शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याबाबत अजित पवार नाराज होतील असे देखील ते म्हणाले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षात अंतर्गत वाद आहेत. पार्थ पवारबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार ही नाराज झाले आहेत. तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल अशी शक्यता निर्माण झाल्याने महाविकास आघाडीच्या कंपूत भीती आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याआधी केंद्र सरकार पडेल असे असबंध विधान केले. सामना वृत्तपत्र चालविणे सोपे आहे मात्र नरेंद्र मोदींशी सामना करणे त्यांना जमणार नाही असा टोला त्यांनी लगावला.
बांद्रा येथील त्यांच्या संविधान निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी सुशांत सिंग प्रकरण आणि पार्थ पवार यांच्याविषयी प्रतिक्रिया नोंदवली. बॉलिवूड मधील निर्माते दिग्दर्शक कलाकार चांगले असले तरी काही प्रमाणात कलाकारांवर अन्याय होतो. अमिताभ बच्चन सारख्या कलाकाराला ही सुरुवातीला प्रचंड संघर्ष करावा लागला त्यानंतर ते बिगबी झाले. त्यामुळे सुशांत सिंग या कलाकारावर अन्याय झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयद्वारे झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.