पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. संपूर्ण देशाचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलं होतं. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित करताना ५०० वर्षांपूर्वीच्या स्वप्नाची पूर्तता होत असल्याची भावना व्यक्त केली.
“या क्षणामागे ५०० वर्षांचा संघर्ष, साधना आहे. भारताची लोकतांत्रिक मूल्ये, कायदेशीर प्रक्रिया, संविधानाची संमती या सगळ्या प्रक्रियेतून जात आज हा दिवस दिसतो आहे. या क्षणाची वाट पाहात अनेक पिढ्या गेल्या. अनेक महापुरुषांनी बलिदान दिलं. आपल्या डोळ्यांसमोर राम मंदिर उभं राहावं अशी अनेकांची इच्छा होती. नरेंद्र मोदींनी कायदेशीर तसेच शांततेच्या मार्गाने समस्येचे निराकरण कसे केले जाते हे दाखवून दिले आहे. नरेंद्र मोदींमुळे हा क्षण सत्यात उतरला आहे” असे वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
“१३५ कोटी भारतवासियांसाठी आणि जगातील अनेक हिंदूंच्या भावनांना पूर्ण करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत,” असंही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी म्हटलं.