मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आज चांगलाच वादळी ठरला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने कोरोना काळात कोणतेही काम केले नसल्याचे म्हणत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच प्रायव्हेट हॉस्पिटलवर सरकारचे वचक राहिलेला नाही असे म्हणत फडणवीस यांनी खाजगी रुग्णालयाच्या कामकाजांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला बेड मिळतोय मात्र गरिबाला बेड फुल्ल असा दाखवतात असे म्हणत फडणवीस यांनी रुग्णालय न मिळाल्याने मृत्यू झालेल्या रुग्णांची नावासहित यादी वाचून दाखवली. तसेच कितीतरी खाजगी रुग्णालयांनी मृत्यू झाल्यानंतर पेशंटची अदलाबदल देखील करत असल्याची गंभीर बाब विरोधी पक्षनेत्यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
कमी टेस्ट करून रुग्णांची संख्या कमी दाखवली जात आहे आणि सरकार स्वतः आपली पाठ थोपटवून घेत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
कोरोना भ्रष्टाचाराबाबत सवाल
कोरोनाच्या नावाखाली अनेकांनी भ्रष्टाचार केला आहे. ऑक्सिजनचा देखील काळाबाजार सुरु आहे. वाढीव बिलामुळे जनता हैराण झाली आहे कोणाच्या नातेवाईकांना कामे दिलीत आणि कोण कसली कामे करताय याची पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे ज्यांनी कोरोनाचा भष्ट्राचार केला आहे त्यांना सोडणार नाही असा इशारा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.