सातारा – राज्यसभा खासदार उदयनराजे भोसलेयांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. “प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे”. अशा गावांना राज्यातून आणि विशेषकरुन केंद्रातून लोकसंख्येनुसार विशेष निधी उभा करुन विकासात्मक प्रोत्साहन देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे उदयनराजे भोसलेंनी सांगितले.
राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 15 जानेवारीला सातारा जिल्ह्यातील तब्बल 900 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गेले 9-10 महिने शेतकर्यांसह संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका आल्यामुळे प्रथेप्रमाणे गावागावांत भांडणतंटे, ईर्ष्या, चढाओढ पहायला मिळणार आहे. त्यामुळे कोविड विरोधात लढणारे पोलीस, प्रशासन, वैद्यकीय आरोग्य कर्मचार्यांवर फार मोठ्या प्रमाणात ताण वाढणार आहे. हे टाळायचे असेल तर प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन उदयनराजे भोसलेंनी केले आहे.