शिवसेनेचे अहमदनगरचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबवला, अशा भावपूर्ण शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना आदरांजली दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच मी अनिल भैया यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. कोरोनातून हळूहळू त्यांच्या प्रकृतीला आराम मिळत होता. असं असतांनाच अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. हा आमच्या शिवसेना परिवारावर मोठा आघात आहे. तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे.”
“युती सरकारच्या काळात मंत्रीमंडळात असलेले अनिल राठोड म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते. रस्त्यावर स्वत: उतरुन लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिवसेना नगर जिल्ह्यात अक्षरश: रुजवली. लोकांसाठी आंदोलने केली, त्यांच्या समस्यांची तड लावली. नगर शहरात तर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आणि ते यशस्वी करुन दाखवले,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.