मुंबई – हिंम्मत असेल तर राज्य सरकार पाडून दाखवा असं थेट आव्हान शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिलं होतं. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले अनेक आमदार नाराज आहे. महाराष्ट्रात एक दिवस नक्कीच भूकंप होणार आहे. सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
आठवले म्हणाले, राज्यातलं सरकार आम्ही पाडणार नाही. आम्ही तसा प्रयत्नही करणार नाही आणि तशी गरजही नाही. आपसातल्या मतभेदांनीच हे सरकार कोसळेल असं भाकितही त्यांनी केलं.
सरकार कोसळलं तर अराजक निर्माण होईल या ठाकरे यांच्या वक्तव्या बद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर 30 वर्ष एकत्र होते. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे वेगळं नाही. सगळेच संघाच्या तालमीत तयार झाले आहेत असंही ते म्हणाले.