सातारा : उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर आपलं मत मांडलं. “मराठा समाजात राजकारण नसतं तर मागेच आरक्षण मिळालं असतं. मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे. आरक्षणामुळे समाजात दुरावा निर्माण झाल्याची,” खंत उदयनराजे यांनी बोलून दाखवली.
“आजवर अनेक जाती, समाजाला आरक्षण दिले, कुणाला नव्याने हवे आहे. पण या आरक्षणामुळे सगळा देश, समाज जातीजातीत वाटला जात आहे. समाजात कटुता निर्माण झाली आहे, एक राष्ट्र म्हणून हे खूप वाईट,” असल्याची भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती-पाती मानल्या नाहीत आणि तसे शिकविलेही नाही. त्यांनी व्यक्तीच्या गुणवत्तेला महत्त्व दिले. मी स्वत:ला कधी मराठा म्हणून घेत नाही. मी सर्व जाती-समाज आपलाच मानतो. पण आज या वाढत्या आरक्षणामुळे माणसे दुरावली जात आहेत. सगळा समाज कप्प्यांमध्ये वाटला जात आहे. कधीतरी आपल्याला गुणवत्तेलाच प्राधान्य दिले पाहिजे. यातच आपल्या देशाची प्रगती दडलेली आहे. या आरक्षणामुळे लोक एकमेकांशी बोलण्याचे बंद झाले. लहानपणापासूनचे जिवाला जीव देणारे मित्र दूर झाले. एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.