पुणे : राज्याचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांनी, काल मुंबई हायकोर्टाने, ऍड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावलेल्या निर्णयानंतर, नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. त्यामुळे सगळीकडून आघाडी सरकारवर टीकेचा भडीमार होत असून, यामध्ये राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप अग्रणी आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी ‘लेटरबॉम्ब’ टाकत अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. यानंतर राज्यात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. परमबीर सिंगांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे, अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी याचिका ऍड. जयश्री पाटील यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. यावर काल न्यायालयाने निर्णय देऊन, १५ दिवसात अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, यावरुनच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, “राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अजून एका मंत्र्याच्या पर्दाफाश होणार असून, पुढच्या आठवड्यात सरकारमधून तिसरा राजीनामा येईल.” असे वक्तव्य केले आहे. मात्र, हा मंत्री कोण आहे, हे सांगणे मात्र चंद्रकांत पाटील यांनी टाळले. तसेच, तो मंत्री कोण, हे तुम्ही शोधून काढा, असा सल्ला त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला.
गेल्या सव्वा महिन्याच्या काळात राज्य सरकारमधील संजय राठोड आणि अनिल देशमुख या दोन बड्या नेत्यांना गंभीर आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यामुळे त्यामुळे आता संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर आता कुणाला राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.