मुंबई : देशात एकीकडे करोना साथीने आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांनी रुग्णांचे मृत्यू होत असताना, महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून, दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये, आरोग्य यंत्रणांच्या तांत्रिक अडचणींमुळे, एकूण ३८ करोना बाधित रुग्णांचे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
राज्यात एकीकडे नाशिकमध्ये बुधवारी घडलेली घटना ताजी असतानाच, आज विरारमधील एका रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण आग लागली आणि या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही आग लागली. येथील कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
#WATCH Virar fire incident, not national news…says Maharashtra Health Minister Rajesh Tope
13 people have lost their lives in a fire incident at Vijay Vallabh COVID care hospital in Maharashtra's Virar pic.twitter.com/hNZEHIbnLp
— ANI (@ANI) April 23, 2021
दरम्यान, या घटनेवरून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एका पत्रकाराने १३ जणांचा मृत्यू झाला ही नॅशनल न्यूज नाही का? असं विचारलं असता यावर उत्तर देताना, “आपण रेमडेसिवीरवर बोलू शकतो.ऑक्सिजनबाबत बोलू शकतो. पण विरारची घटना ही काही नॅशनल न्यूज नाही. ही राज्यातील घटना आहे. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार आहोत”, असं विधान केलं आहे.
तसेच त्यांनी, कोणत्याही इमारतीचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आणि इलेक्ट्रीकल ऑडिट करणं आवश्यक असतं. हे नियम न पाळणाऱ्या आणि त्यासंदर्भात दोषी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात सखोल चौकशी केली जाणार आहे. 10 दिवसांत यासंदर्भात अहवाल सादर केला जाईल. घडलेली घटना दुर्देवी आहे” असं म्हटलं आहे.