मुंबई : राज्यात करोना बाधित रुग्णांचा उद्रेक होत आहे. सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधितांची रुग्णसंख्या ५० ते ५५ हजारांवर जात आहे. परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, तसेच काल झालेल्या टास्क फोर्स सोबतच्या बैठकीत, राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यात ७ किंवा १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लॉकडाऊन हा एकच पर्याय नाही. त्यापेक्षा आरोग्य यंत्रणेसाठी पायाभूत सुविधा वाढवा आणि प्रभावी उपाययोजानांवर अधिकाधिक भर द्या, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पाठवत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, यासाठी स्वयंसेवी संस्थांची देखील मदत घ्यावी, अशी सूचना देखील पाटील यांनी केली आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच जण चिंतेत आहेत. केवळ ८ दिवस किंवा १५ दिवसाच्या लॉकडाऊनमुळे तो संपणार नाही. लॉकडाऊनमुळे रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण कमी होईल; पण करोना पूर्णपणे नष्ट होणार नाही. त्यामुळे तात्पुरता लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू करण्यासोबतच प्रदीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, “करोना चाचण्यांसंदर्भात लोक साशंक आहेत त्यामुळे बिनचूक टेस्टिंग किटसाठी पाठपुरावा केला पाहिजे. टाटाने अशा प्रकारचे टेस्टिंग किट उपलब्ध करुन दिले होते, मात्र ती कुठे गायब झाली, याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरु करणे, ज्यांना तीव्र स्वरुपाची लक्षणे आहेत, त्यासाठी ऑक्सिजन बेड वाढवणे गरजेचे असल्याचे मत पाटील यांनी या व्हिडीओतून व्यक्त केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सर्व रुग्णालयांना पुरवणे, रुग्णालयांमध्येच ऑक्सिजन तयार होईल, अशी यंत्रणा कार्यन्वित करणे, जिल्ह्यातील व्हेंटिलेटरचा आढावा घेणे या गोष्टींसोबतच मनुष्यबळाची कमतरता भरुन काढण्यासाठी मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोविडच्या कामात सहभागी करुन घेणे आवश्यक आहे, अशा उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे वारंवार लॉकडाउन केलं तरी, ती साखळी काही कालावधीसाठी थांबते पुन्हा सुरू होते. त्यामुळे, लवकर कोरोनाची लक्षण ओळखून, चांगल्या चाचण्यांची सुविधा उपलब्ध करणे, दर्जेदार हॉस्पिटल, उत्तम आरोग्य सुविधा यावर राज्य सरकारने भर दिला पाहिजे. pic.twitter.com/MGgTED5BAJ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 12, 2021