मुंबई : ठाणे येथील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची, भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने, ठाणे शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपासात एका आरोपीला थेट उ.प्रदेशातून अटक केली होती.
दरम्यान, आरोपीला बेड्या घालून त्याची चौकशी केली असता आरोपीने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजिब मुल्ला यांच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी आता या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत, नगरसेवक नजिब मुल्ला यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, ‘सत्ताधाऱ्यांची माणसं दिवसाढवळ्या खून करत आहेत. जर अशी मंडळी यांना पक्षात सांभाळायची असतील, तर दुसऱ्यांचे हात काही बांधलेले नसतात. खुनाला खुनाने उत्तर द्यायला सुरुवात झाली, तर सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे चित्र चांगले दिसणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “ठाण्याचे मनसे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या झाली होती. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी एका आरोपीला, उ.प्रदेशमधून अटक केली होती. या आरोपीने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजिब मुल्ला यांचे नाव आले आहे. याच नजिब मुल्ला यांचं नाव सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात आलं होतं. पुढे ते प्रकरण निस्तरलं गेलं. पुन्हा याच नजिब मुल्लाचं नाव आलं आहे. नजिब मुल्ला याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आता राज्य सरकार काय कारवाई करतं ते पाहावं लागेल, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आपण भेट घेणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.