मुंबई : राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन असे अनेक उपाय केले जात आहेत. मात्र तरी देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील करोना बाधितांची संख्या ६० हजारांवर गेली असून, त्यामुळे राज्यात आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली आहे.
परिणामी इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. अशा हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत (१४४ कलम) संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच या कडक निर्बंधांचे पालन संपूर्ण राज्यात योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत.
मात्र, या नियमांच्या अंमलबजावणीच्या दुसऱ्याच दिवशी राज्यात अनेक ठिकाणी ‘जैसे थे’च परिस्थिती पाहायला मिळत असून, नागरिक किराणा माल, भाजीपाला मार्केट, सार्वजनिक ठिकाणी व इतर अनेक ठिकाणी गर्दी करताना आढळून येत आहेत. त्यामुळे ज्या कारणांसाठी राज्य सरकारकडून हा लॉकडाऊन करण्यात आला आहे, त्या कारणांनाच खो बसत असल्याचे दिसत आहे.
मुंबईत देखील अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती दिसून येत असल्याने, पोलिसांना संयमाने कारवाई करण्याच्या सूचना आहेत; पण त्यांना कडक पावले उचलण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईकर नागरिकांना दिला आहे. नियमांचे पालन करीत, पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
पोलीस उपायुक्तांकडून सकाळी ११ ते दुपारी १२ पर्यंत, तसेच सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान गर्दीच्या ठिकाणावरील फाेटाे मागविण्यात आले आहेत. त्यानुसार त्या भागात अतिरिक्त फाैजफाटा तैनात करण्यात येणार आहे, तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई वाढविण्यात येणार आहे. झूम मीटिंगद्वारे पोलिसांसोबत बैठक घेत त्यांना कारवाईबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
५५ वर्षांवरील कर्मचारी, अधिकारी पोलीस ठाण्यात गेल्या वेळेस ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना घरी थांबविण्यात आले होते. मात्र, सध्या अशा पोलिसांना पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. फील्ड वर्कसाठी जास्तीत जास्त तरुण पोलिसांवर जबाबदारी देण्यात येत आहे. तसेच कडक निर्बंधांच्या काळात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही आयुक्तांनी केले.
शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ३० हजारांच्यावर नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ कोटी ४५ लाखांवर पोहोचली असून, करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ लाख ७५ हजार ६४९ वर पोहोचला आहे. देशातील करोनाग्रस्तांपैकी १६ लाख ७९ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.