मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांचा उद्रेक होत आहे. गेले सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधितांची रुग्णसंख्यासुद्धा ५० ते ५५ हजारांवर जात आहे.
त्यामुळे आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे, या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय आज किंवा उद्यामध्ये घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
या बैठकीला अजित पवार, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, सीताराम कुंटे हजर होते. यावेळी अचानक लॉकडाऊन जाहीर करण्याऐवजी लोकांना विश्वासात घ्या, लॉकडाऊनचा रोड मॅप लोकांसमोर मांडा आणि मगच निर्णय घ्या, असा आग्रह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत धरला.
तसेच, त्यांनी राज्यात संपूर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शवला असून, राज्यातील सर्व स्तरांतील आणि घटकांतील नागरिकांचा विचार करून निर्णय घेण्यात यावा, असं त्यांनी यावेळी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
“फडणवीसांनी लॉकडाऊनला विरोध केलाही असेल. ही त्यांच्या पक्षाची राज्याची भूमिका आहे. त्यांची देशपातळीवरील भूमिका निराळी असू शकते. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जारी केला तर तेव्हा फडणवीसांची भूमिका काय असेल? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन करा अशी त्यांची भूमिका असेल का?,” असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
आज राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत यावर भाष्य केलं, त्यावेळी संकटाच्या परिस्थितीत अशा प्रकारचं राजकारण करणं हे अशोभनीय आहे. हे आम्हाला आणि विरोधकांसाठीही अशोभनीय आहे. सरळ रस्त्यावरून जात यावर आपल्याला मार्ग शोधायला हवा आणि लोकांचे जीव आपण वाचवले पाहिजे, असंही राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, संसर्ग थांबवायचा असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, मात्र ते करताना कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही दिली. जवळपास अडीच तास सुरु असलेल्या या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून देखील अनेक सूचना करण्यात आल्या.