मुंबई : राज्यात करोनामुळे हाहाकार उडाला असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी व टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर, काल रात्री साडेआठ वाजता फेसबुक लाइव्हद्वारे, राज्यात बुधवार रात्री ८ वाजेपासून, १ मे २०२१ पर्यंत संपूर्ण संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसचं या कडक निर्बंधांचा आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होऊ नये म्हणून, दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेजही त्यांनी जाहीर केले आहे.
यावरून आता विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘सरकारने जाहीर केलेली ३ हजार ३०० कोटींची तरतूद ही अर्थसंकल्पातील नियमित तरतूद आहे. त्यामुळे ही कोरोनासाठीची तरतूद नाहीच. त्यामुळे सरकारचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक आहे,’ असे म्हणत सरकारवर हल्लबोल केला आहे. दरम्यान, त्यांच्या या टीकेला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच, केंद्रातील मोदी सरकारवरही त्यांनी निशाणा साधला आहे.
आज प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी, ‘देवेंद्र फडणवीसांचे केंद्रात वजन नाही, हे मला माहिती आहे. कारण त्यांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण त्यांचे वजन असेल, तर त्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याचे केंद्रात अडकलेले ९० हजार कोटी रुपये मिळवून द्यावेत आणि या मुद्द्यावर राजकारण करू नये, असा खोचक टोला पटोले यांनी फडणवीसांना लगावला आहे.
तसेच केंद्रातल्या मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवताना, ‘देशात सगळ्याच राज्यांमध्ये करोनाचा फैलाव वाढत चालला असताना पंतप्रधान मोदी काय करत आहेत, त्यांना केवळ निवडणुका दिसत आहेत. विनामास्क प्रचार करून ते कोणता संदेश देतात? पंतप्रधान प्रचारात मस्त आहेत आणि जनता करोनाने त्रस्त आहे. लोकांचा जीव जातोय. त्यामुळे या परिस्थितीवरून कुणीही राजकारण करू नये, असा सल्ला पटोले यांनी दिला आहे.
सध्या महाराष्ट्रसह छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये देखील करोना विषाणूचा वेगाने फैलाव होत असून, देशात एका दिवसाला करोनाचे दीड लाखांहून अधिक बाधित रुग्ण सापडत आहेत.