नाशिक : एकीकडे करोनाच्या विळख्यात महाराष्ट्र राज्य सापडले असताना, दुसरीकडे आज नाशिकमध्ये हृदय पिळवटून टाकणारी एक वाईट घटना, महापालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात घडली. नाशिकमध्ये आज दुपारी १२ च्या सुमारास, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आवारात असलेल्या एका मोठ्या ऑक्सिजन टाकीतून, प्रचंड प्रमाणात वायू गळती होऊन, तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. दोन ते अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही वायू गळती थांबवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे.
या घटनेनंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावर आपली शोकमग्न प्रतिक्रिया दिली आहे. या दुर्घटनेस जे कुणी जबाबदार असतील त्यांची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे.
ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सुचना दिल्या आहेत, असे असताना हे कसे घडले ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी, असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
दरम्यान, आज सकाळच्या सुमारास डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या मोठ्या ऑक्सिजन टाकीचा कॉक नादुरुस्त असल्याने, त्यातून गळती सुरू झाली. ही गळती रोखण्यासाठी जेव्हा तंत्रज्ञ कारागीर दाखल झाले आणि दुरुस्तीचे काम सुरू झाले, त्याचवेळेस नादुरुस्त कॉक पूर्णपणे तुटला. त्यांनतर ऑक्सिजन टाकीतून मोठ्या प्रमाणात वायू गळती होऊन ही दुर्दैवी घटना घडली आहे.