मुंबई : काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बृह्नमुंबई महापालिकेने शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बीएमसी पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे असणार असल्याचे माहिती दिली आहे.
कोरोना प्रभावित जिल्ह्यातील शाळा सुरू करताना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, शिक्षण अधिकाऱ्यांनी विचारविनिमय करून विद्यार्थ्यांचे आरोग्य, शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा. शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा आहे.
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) November 20, 2020
शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
येत्या सोमवारपासून नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पण, शाळा सुरू करणे बंधनकारक नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.