पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी थेट शरद पवार गटाच्या नेत्यांवर टिकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. त्याआधी अमोल कोल्हे यांनी मागील पाच वर्षात लोकसभा मतदारसंघातील सहा ही विधानसभा मतदारसंघात काम केलं नसल्याची टीका केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या कामाचा पाढा वाचत शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार देणार आणि आमचा उमेदवार निवडून आणणारच असा थेट इशाराच अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना दिलाय. यावर आता अजितदादांनी संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया माजी आमदार विलास लांडे यांनी दिलीय.
अजित पवार म्हणाले की, पुण्यात संघर्ष यात्रा होत आहे. परंतु त्याच्यातील एका खासदारांने मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर फार बरं झालं असतं. अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी दिलीप वळसे पाटील आणि मी जीवाचं रान केलं आहे. त्याला मी खासदारकी दिली आहे. काही दिवसापुर्वी अमोल कोल्हे राजीनामा देण्यासाठी माझ्याकडे आला होता. मधल्या काळात स्थानिक मतदारसंघात फिरले नाहीत. दुर्लक्ष केले. त्यांनी पुर्णपणे मला आणि वरिष्ठ नेत्यांना राजीनामा देत असल्याचं सांगितलं होतं. एक कलावंत आहे. माझ्या करिअरवर परिणाम होत आहे. चित्रपट चालत नाहीत. याचा माझ्या आर्थिक गोष्टींवर परिणाम होतो. अशाही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या.
दरम्यान, अजितदादांनी शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देणार असल्याचं घोषीत केल्यानंतर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आपली इच्छा व्यक्त केली. अजितदादांनी जे सांगितलंय ते खरं आहे. असंही त्यांनी म्हटलंय. अजित दादांनी संधी दिली तर खासदारकी लढणार असल्याची प्रतिक्रिया विलास लांडे यांनी दिली आहे. तसेच मागच्या वेळेस आपली जोरदार तयारी झाली होती. त्यावेळी अमोल कोल्हे यांना पक्षांनी संधी दिली. त्यानंतर मी अजित पवार यांचं नेतृत्व मान्य करून थांबलो. परंतु आता आपली उमेदवारी शंभर टक्के आहे. असंही लांडे म्हणाले.