औरंगाबाद – शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी औरंगाबादच्या नामांतरावरुन ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. तसेच केवळ सामनात किंवा सोशल मीडियावर संभाजीनगर लिहून नाव बदलत नाही, तर सरकारने नोटिफिकेशन काढावं, असं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेवर या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आणि लोकांचा बळी घेत असल्याचाही आरोप केला.
विनायक मेटे म्हणाले, “सामना दैनिकात किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहिलं म्हणजे नाव बदलत नाही. त्यासाठी नोटिफिकेशन काढावं लागतं. नोटिफिकेशन काढा आणि मग बघा काँग्रेस विरोध करतं का? आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून अशी स्थिती शिवसेनेची झाली आहे. लोकांना एकमेकांच्या अंगावर घालण्याचं काम शिवसेना करत आहे.”
“राजकारण करण्यासाठी नगरसेवक वाढवण्यासाठी शिवसेना राजकारण करत आहे आणि लोकांचा बळी घेत आहे. मंत्री विजय वडेट्टीवरांनी मेळावा घेतला आणि त्यांच्यातल्या त्यांच्यात मारामारी झाली. देवेंद्र फडणवीस यांनी इमानदारीने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, पण ज्या मुस्लिमांच्या जीवावर काँग्रेस राष्ट्रवादीने राजकारण केलं,” असंही विनायक मेटेंनी सांगितलं. तसेच महाविकासआघाडी मुस्लिमांना आरक्षण का देत नाही? असा सवालही त्यांनी केला.