प.बंगाल : प.बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने लागले आणि राज्यात तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर बंगालमधील विविध भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या असून, आता पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील पंचखुंडी गावात केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, व्ही. मुरलीधरन हे या हल्ल्यातून बचावले असून, त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाले आहे. स्वतः राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या हल्ल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काही लोकं त्यांच्या ताफ्यावर हल्ला करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आपल्याला दौरा मध्येच सोडून परतावं लागल्याचं देखील व्ही. मुरलीधरन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
TMC goons attacked my convoy in West Midnapore, broken windows, attacked personal staff. Cutting short my trip. #BengalBurning @BJP4Bengal @BJP4India @narendramodi @JPNadda @AmitShah @DilipGhoshBJP @RahulSinhaBJP pic.twitter.com/b0HKhhx0L1
— V Muraleedharan (@VMBJP) May 6, 2021
व्ही. मुरलीधरन हे प.बंगालमधील हिंसाचारानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय टीमचे सदस्य आहेत. ते पश्चिम मेदिनीपूर मधील हिंसाचाराग्रस्त पीडित कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचले असता, भाजप कार्यकर्त्यांसोबतची बैठक आटोपून ते परत निघाले होते. त्यावेळी काही स्थानिक लोकांनी त्यांच्या गाडीवर जोरदार हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर आता या हिंसाराचाराच्या घटनांवरून भाजपकडून ममतांना लक्ष्य केलं जात आहे.
निवडणुकांच्या निकालानंतर बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ४ सदस्यांच्या समितीची नेमणूक करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी बंगालमध्ये दाखल झाले आहेत.