मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील रस्ते कामांची पाहणी केली. ईडीची नोटीस राजकीय हेतूने प्रेरित आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. राजकीय आकसापोटील या नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे सर्व राजकीय आहे. महाविकास आघाडी त्याला घाबरत नाही. महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत आहे, असं सांगतानाच आम्ही देश आणि महाराष्ट्रासाठी काम करत असून आमचं काम सुरूच ठेवणार असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहे. पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने वर्षा यांना 29 डिसेंबर रोडी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.