पुणे : लोकसभा निवडणुकीत राज्यात अत्यंत चुरशीची लढत झालेल्या शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये आजी माजी खासदारांची सोशल मीडियावर चांगलीच जुंपलेली पहायला मिळाले. शिरूर लोकसभा मतदार संघात खासदारकीची हॅट्रिक मारून इतिहास रचणारे शिवाजीराव आढळराव पाटील आणि संभाजी महाराज मालिका फेम विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी सुरु झाल्याचं सोशल मीडियावर पहायला मिळाला.
भाजपमध्ये नेमकं कोण जाणार ?
दोनीही आजी माजी खासदारांकडून एकमेकांवर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आरोप जोरदार पद्धतीने केला गेला यामुळे शिरूर मधील कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.
अमोल कोल्हे हे आपल्या चारही आमदारांना वैतागले असल्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशा प्रकारच्या बातम्यांचे कात्रण मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते तर राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत असल्यामुळे शिरूर लोकसभेसाठी आढळराव यांना शिवसेनेकडून दरवाजे बंद होतील म्हणून आढळराव भाजपमध्ये प्रवेश करणार असलेल्या बातम्यांचे कात्रण देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यामुळे आजी माजी खासदारांची ही चिखलफेक नेमकी कशासाठी आहे असा प्रश्न देखील मतदार संघातील अनेकांना पडला आहे.
भाजपला आढळराव – कोल्हे यांची गरज आहे का ?
राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे सर्वाधिक आमदार निवडून येऊन देखील देवेंद्र फडणवीस हे विरोधी बाकावर बसलेले आहेत. मात्र केंद्र सरकारचा त्यांना पूर्णपणे पाठींबा आहे. अशात भाजपला या दोनीही आजीमाजी खासदारांची आवश्यकता आहे का असा प्रश्न निर्माण होतो. मात्र राज्यातील भाजप जरी विरोधी पक्षात असले तरी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मजबूत नेतृत्व भाजपसोबत आहे.
राज्यातील भाजपला शिरूर मतदारसंघातील आजीमाजी खासदारांची तितकीशी मदत होणार नाही हे स्पष्ट आहे. कारण त्या भागात भाजपकडे अनेक चांगले चेहरे आहेत ज्यांचा पक्षाला खूपच फायदा होताना दिसत आहे. ज्यामध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे,तसेच माजी खासदार अनिल शिरोळे यांचे आमदार पुत्र सिद्धार्थ शिरोळे तसेच भाजपचे अनुभवी नेते खासदार गिरीश बापट असे अनेक चेहरे पुणे जिल्ह्यामध्ये भाजपकडे असताना भाजप बाहेरून एखादा नेता आयात करण्याचा विचार करेल असे तरी तूर्तास वाटत नाही.
तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभेमध्ये भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे इनकमिंग जोरदार पद्धतीने स्वीकारले होते. मात्र हीच बाब जनतेला न रुचल्याचा भाजपला थोडाफार का होईना पण फटका बसलेला दिसला होता त्यामुळेच अशा या इतर पक्षातील आजीमाजी खासदारांना भाजप तितका भाव देईल असे वाटत नाही.