नवी दिल्ली – सचिन वाझे केस प्रकरणात निर्माण झालेल्या गोंधळावरून, राज्यातले राजकीय वातावरण तापले आहे. माजी पोलीस आयुक्तांनी थेट राज्याचे विद्यमान गृहमंत्र्यांचे नाव घेऊन, त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याने, राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
माजी पोलीस आयुक्तांनी थेट राज्याचे विद्यमान गृहमंत्र्यांचे नाव घेऊन, त्यांच्यावर केलेल्या, १०० कोटींच्या वसुलीच्या गंभीर आरोपाने महाविकासआघाडी सरकारमध्ये देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन काही सवाल उपस्थित केले आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत विरोधकांनी केलेल्या आरोपांवर काही मुद्दे देखील स्पष्ट केले आहेत. ‘वाझेंना परत सेवेत घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंग यांचाच होता. यामध्ये मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांचा कोणताही हात नाही. पत्रकार परिषदे आधी माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. अनिल देशमुखांबाबत उद्यापर्यंत निर्णय घेण्यात येईल. अनिल देशमुखांच्या पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मात्र गृहमंत्र्यांचं याबाबत म्हणणं देखील ऐकून घेतलं जाईल.’
परमबीर सिंग यांनी पत्रात शरद पवार यांचा उल्लेख केला आहे. त्यावर देखील शरद पवारांनी भाष्य केले, ‘परमबीर सिंग यांच्याशी माझी भेट झाली होती. त्यांनी माझ्याशी गाडीतील स्फोटकांबाबत चर्चा केली. नंतर त्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले.’असे त्यांनी सांगितले. यावेळेस त्यांनी परमबीर सिंग व त्यांनी लिहिलेल्या पत्राला घेऊन काही सवाल देखील उपस्थित केले.
‘बदली झाल्यानंतरच परमबीर यांनी हे आरोप केले. आयुक्त असताना त्यांनी असे कोणतेही आरोप केले नाहीत. त्यामुळे त्यांनी बदली आधी हे आरोप का केले नाहीत? पत्रात उल्लेख केलेले १०० कोटी कुणाकडे गेले? याचाही उल्लेख पत्रात नाही.’ असे सवाल यावेळेस पवारांनी उपस्थित केले.
तर शरद पवार यांनी फडणवीस यांच्या दिल्लीवारीवर सवाल उठवले आहेत. ‘फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर हे पत्र समोर कसं आलं?’, त्यामुळे हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, या प्रकरणाचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, सरकार स्थिर आहे. उद्या या सर्व प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
दरम्यान, सचिन वाझे केस प्रकरणात विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे आधीच महाविकासाघडी सरकार अडचणीत आले होते. त्यातच गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत होती. त्यातच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले. त्यामुळे विरोधकांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह याना हाताशी धरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना पदावरून पायउतार करण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप सत्ताधारी पक्षांकडून होत आहे.
तसेच परमबीर सिंह यांनी बदली झाल्यानंतरच हे आरोप केले. बदली आधी हे आरोप का केले नाहीत? तसेच पत्रात उल्लेख केलेलं १०० कोटी कुठे गेले? हा देखील उल्लेख पत्रात नसल्याने शरद पवार यांनी विचारलेल्या सवालांमध्ये सत्यता असल्याची शक्यता निर्माण होत आहे. मात्र यावर परमबीर सिंह यांच्याकडून काहीही स्पष्टीकरण किंवा उत्तर आले नसल्याने हे प्रकरणात आणखी गूढता निर्माण होत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी स्पष्ट केलेले मुद्दे यांच्या तथ्य असण्याची शक्यता दाट आहे.