सासवड : विजय शिवतारे यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयाने बारामतीमध्ये महायुतीत बंडखोरी होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता, अखेर शिवतारे यांनी माघार घेत अजित पवार यांच्याशी मैत्री करण्याचा निर्णय झाला, मात्र हा निर्णय नेमका का घेतला याचा खुलासा शिवतारे यांनी आज सासवडच्या जनसंवाद मेळाव्यात केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुती मद्धीक घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.
शिवतारे म्हणाले, बारामती लोकसभेसाठी मी घेतलेला निर्णय आणि मांडलेली मते योग्य होती. अनेक सामाजिक कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, तर माघारीसाठी दोनदा मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झाली. परंतु, माझं मन तयार होत नव्हतं. देवेंद्र फडणवीस साहेब दोन-तीन वेळा बोलले. दादा मुख्यमंत्र्यांशी बोलत होते. मी निश्चय केला होता की कोणत्याही परिस्थितीत लढायचं म्हणजे लढायचं. प्रचंड राग त्यावेळी आला होता. कधी कधी बोलता बोलता अनेकांच्या चुका होतात.
मी व्यक्त केलेला रोष पुरंदरच्या जनतेचा होता. जेव्हा जेव्हा मी गावात जायचो सर्व बसलेले लोक मला म्हणायला लागले बापू आम्ही ऐकणार नाही. नरेंद्र मोदींना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान बनवण्यासाठी दादा असतील, भाई असतील सर्वजण आम्ही सर्व एवढ्याच कारणासाठी त्यांच्याबरोबर आहोत. एक अतिशय निस्वार्थी त्यागी असं व्यक्तिमत्व हे भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजे, यासाठी माघार घेतली. काही लोकांमन म्हणाले किती खोके घेतले, दादांसमोर फाटली काय मात्र, विजय बापू शिवतारेंना कोणत्याही आणि कोणाच्याही खोक्यांची गरज नाही. असेही शिवतारे म्हणाले.