मुंबई – मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये विधिमंडळात आणि बाहेर जोरदार बाचाबाची सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे या आरोपांच्या केंद्रस्थानी आहेत.
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी एटीएसला दिलेल्या जबाबात सचिन वाझेंनी खून केल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर “मनसुख हिरेन हत्येप्रकरणी सचिन वाझेंना अटक करा,” अशी मागणी फडणवीसांनी केली. तर, “अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून वाझेंना टार्गेट केलं जातंय,” असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. सचिन वाझेंच्या मुद्यावर विधिमंडळाचं अधिवेशन तब्बल 9 वेळा तहकूब करण्यात आलं.
हिरेन मनसुख प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले . फडणवीसांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे महाविकासआघाडी बॅकफूटवर गेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सादर केलेले पुरावे आणि विषयाच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना मंगळवारी सभागृहात नेमकं काय उत्तर द्यायचं हेच कळेनासे झाले होते.
या गदारोळानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याचे समजते. या चर्चेनंतरच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तडकाफडकी सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून हटवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या दूरध्वनीवरील चर्चेत नेमके काय घडले हे अद्याप तरी समोर आलेले नाही
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानपरिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. विरोधकांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही सचिन वाझे यांना मनसुख हिरेन प्रकरणाच्या तपासावरून आणि गुन्हे शाखेतून हलवण्याचा निर्णय घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. मात्र या आरोपाच्या केंद्रस्थानी विरोधकांनी सचिन वाझे यांना का धरले आहे हा सवाल देखील उपस्थित होतो.
सचिन वाझे आरोपाच्या केंद्रस्थानी का?
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सरकारने तपास एटीएसला दिला. एटीएसला दिलेल्या जबाबात विमला यांनी सचिन वाझेंवर खळबळजनक आरोप केले. “सचिव वाझे माझ्या पतीला ओळखत होते. नोव्हेंबर महिन्यात माझ्या पतीने गाडी वाझे यांना वापरण्यासाठी दिली होती. वाझेंनी फेब्रुवारी महिन्यात गाडी परत दिली,” असा आरोप विमला यांनी केला.
विमला पुढे म्हणतात, “26 फेब्रुवारीला सचिन वाझेंनी माझ्या पतीला चौकशीसाठी नेलं. संध्याकाळी ते त्यांच्यासोबतच घरी आले. पुढे दोन दिवस माझे पती सचिन वाझेंसोबत जात होते आणि येत होते.” “वाझेंनी माझ्या पतीला या प्रकरणात अटक हो. तुला 2-3 दिवसात जामिनावर बाहेर काढतो,” असं माझ्या पतीने मला सांगितल्याचा जबाब एटीएसला दिलाय.
या जबाबात विमला पुढे आरोप करतात, “माझे पती मनसुख यांचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केल्याचा मला संशय आहे.” एटीएसने मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांच्या तक्रारीवर अज्ज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे
शुक्रवारी 5 मार्चला मनसुख हिरेन यांचं प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात उपस्थित केलं. हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर ठाणे पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. “सचिन वाझेंना कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? पुरावे असतानाही सरकार वाझेंवर का कारवाई करत नाही? ते एका पक्षात होते म्हणून? असं म्हणत सचिन वाझेंना अटक करा,” ही मागणी फडणवीस यांनी लावून धरली.
शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी “अर्णब गोस्वामी यांना सचिन वाझेंनी अटक केली म्हणून त्यांना टार्गेट करण्यात येतंय,” अशी प्रतिक्रिया दिली.”सचिन वाझे साधे पोलीस अधिकारी आहेत. ते आयुक्त नाहीत, कोणत्या संस्थेचे प्रमुख नाही. मग विरोधीपक्ष या अधिकाऱ्याला का घाबरतं?” असा सवाल परब यांनी विरोधीपक्षाला विचारलाय.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, “आमचा मुद्दा सचिन वाझेंच्या चौकशीचा आहे. पुरावे असताना त्यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही? राजकारणासाठी ज्या मुद्यांचा संबंध नाही असे मुद्दे सत्ताधाऱ्यांकडून उकरून काढले जात आहेत. आमचा मुद्दा सचिन वाझेंवर कारवाईचा आहे. सरकार या प्रश्नाचं उत्तर देत नाही.”
सचिन वाझेंवर करण्यात आलेल्या आरोपामागे विरोधकांचं राजकारण ?
सचिन वाझेंच्या अटकेची मागणी विरोधकांनी करताच. सत्ताधारी शिवसेनेने अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विधीमंडळात गोंधळ सुरू झाला.विरोधकांनी “सरकार खूनी है” अशी घोषणाबाजी सुरू केली. पण, सरकारने सचिव वाझेंवर कारवाईबाबत एकही शब्द उच्चारला नाही. त्यामुळे मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सरकार सचिन वाझेंवर कारवाई करेल असे संकेत दिसून येत नाहीत.
सचिन वाझे शिवसेनेत होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ते अत्यंत जवळचे मानले जातात. अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या अटकेमागे वाझेंची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अर्णब गोस्वामींच्या कथित TRP घोटाळ्याचा तपास सचिन वाझे करत होते. या प्रकरणात बार्कचे माजी प्रमुख पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे अर्णब प्रकरणी वाझेंचा वापर ठाकरे सरकारने विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सचिन वाझे हे नाव समोर आल्याने सचिन वाझे हेच प्याद पकडून विरोधक सरकारला कोंडीत पकडत आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.