देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई का होत नाहीये? भाई जगताप यांनी राज्य सरकारला घरचा आहेर
मुंबई: बिकेसी येथे रात्रीच्यावेळी एका गुजरातच्या व्यापाऱ्याला वाचवण्यासाठी राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेता प्रवीण दरेकर पोहचले होते. ते जाणीवपूर्वक त्या व्यापाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. माझं स्पष्ट मत आहे की, या प्रकरणात मोठं गौडबंगाल आहे. त्यामुळे याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांनी एसआयटी नेमावी; अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक आठवड्यापूर्वी पत्र लिहून केली होती. यासाठी मी स्वतः जाऊन त्यांची भेट देखील घेतली होती. परंतु एक आठवडा उलटून देखील अद्याप काहीच झालं नाही, असं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलं आहे.
मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप विविध प्रश्नांसंबंधी पत्रकारांशी बोलत होते. माझा सरकारला सवाल आहे की, सचिन वाझे या गुन्हेगाऱ्याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होतो, मग मी पत्र देऊन देखील देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि उपस्थित आमदार यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही? अशा शब्दांत भाई जगताप यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला यासोबतच अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील विमानाने 10 हजार रेमडेसिवीर घेऊन येतात आणि वाटतात. हा काय प्रकार आहे?, असा सवालही काँग्रेस नेते भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे.
कोविड परिस्थिती बाबत बोलताना भाई जगताप म्हणाले की, १ मेला लसीकारण सुरु होईल असं वाटतं नाही. सध्या मुंबईतील प्रमुख लसीकरण केंद्र बंद आहेत. कारण केंद्राकडून आवश्यक साठा आलेला नाही. 35 हजार कोटींची तरतूद केंद्राने केली आहे. मग आपण कमी कुठं पडत आहोत? देशाचे पंतप्रधान याबाबत बोलणार आहेत का? केंद्रानं जाहीर केलेलं 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज कुठं गेलं? राज्याला मोफत लसी उपलब्ध होत नाही असं का होतंय? त्यांनी लस मोफत उपलब्ध करून द्यावी. राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कोर्टानं कडक लॉकडाऊन करावं.” असं ते म्हणाले.