मुंबई : कोवि़ड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आता नागपूर ऐवजी मुंबईत होणार आहे. काल झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आज धान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 14 आणि 15 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हिवाळी अधिवेशन घेण्यासंदर्भात चर्चा सुरु होती. आता मात्र या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. नागपूरमध्ये अधिक थंडी असते त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे पुन्हा कोविड-19 चा संसर्ग वाढू नये यासाठी मुंबईत अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे नियोजन करण्यासाठीची तयारी विधिमंडळ कामकाज समितीकडून सुरू होती. दरम्यान, आज झालेल्या विधिमंडळ कामकाज समिती बैठकीत अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यावेळचे विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच होणार आहे. तसेच हे अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबर असे दोन दिवसच चालणार आहे.
विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री ॲड.अनिल परब, मंत्री सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, दिलीप वळसे-पाटील, सुभाष देसाई, अनिल देशमुख, सतेज पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह विधानपरिषद आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.