मुंबई : हाथरस बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळत असून युपी पोलिसांच्या वागणुकीवरून योगी सरकारवर टीका होत होती. त्यानंतर योगी सरकारने या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या अगोदर आज उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी व डीजीपी हितेशचंद्र अवस्थी यांनी या कुटुंबाची भेट घेतली. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन अवस्थी यांनी या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना दिले होते.
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. हाथरस प्रकरणासह उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवरून योगी सरकारला सवाल केले जात आहे. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास रोखल्यानंही सरकारवर टीका होत आता कॉग्रेसचे धुळ्याचे आमदार कुणाल पाटील यांनी योगी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
आमदार पाटील यांनी हाथरस प्रकरणात सरकारच्या भूमिकेसंदर्भात ट्विट केलं आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरलेल्या उत्तरप्रदेश सरकारमधील सत्ताधारी भाजपचे आमदार बलात्काराच्या घटनांना महिलांचे संस्कार जबाबदार आहेत असा निर्लज्ज तर्क लावत आहेत. आत्मनिर्भर भारतात आता आमच्या माताभगिनींनी स्वतःच्या रक्षणासाठीही “आत्मनिर्भर” व्हावं का? असं पाटील यांनी म्हटलं आहे.
महिला सुरक्षेच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरलेल्या उत्तरप्रदेश सरकारमधील सत्ताधारी भाजपचे आमदार बलात्काराच्या घटनांना महिलांचे संस्कार जबाबदार आहेत असा निर्लज्ज तर्क लावत आहेत. आत्मनिर्भर भारतात आता आमच्या माताभगिनींनी स्वतःच्या रक्षणासाठीही "आत्मनिर्भर" व्हावं का? https://t.co/4FjekX52ze
— Kunal Patil (@Kunal_R_Patil) October 5, 2020
हाथरस प्रकरणाचे संतप्त पडसाद देशभरात उमटत आहेत. राजकीय नेत्यांकडून पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, सरकारकडून त्याला विरोध केला जात आहे. राजकीय नेत्यांवर लाठीमार केल्याचे प्रकार घडले. विशेष म्हणजे माध्यमांना भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं.
पीडित मुलीचे गाव बुलगढीला पोलिसांनी वेढा घातला असून गावाची पूर्ण नाकाबंदी करण्यात आली आहे. गावाबाहेरील कोणालाही आत सोडले जात नाही. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे गावकरीही बाहेर येऊ शकत नाहीत, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. विशेष तपास पथक चौकशी करत असून त्यात अडथळे येऊ नयेत, यासाठी कोणालाही गावात जाऊ दिलेले नाही, असे स्पष्टीकरण पोलीस उपमहासंचालक प्रवनकुमार यांनी दिले. पीडित मुलीच्या नातलगांशी दूरध्वनीवरूनही बोलू दिले जात नसल्याचा आरोप नेत्यांकडून केला जात आहे.