पाकिस्तानी सेनेच्या प्रवक्त्यांनी भारताने ५ राफेल आणू द्या अथवा ५०० आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही कोणत्याही परिस्थिती त्यांच्याशी दोन हात करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
भारतात दाखल झालेल्या राफेलवर बोलताना पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी सांगितले की, भारताकडे राफेल असो वा एस ४००.. पाकिस्तानी सैन्य कोणत्याही आक्रमणाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयारीत आहे. इफ्तिखार पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांना यात राफेल, भारताचे वाढते सुरक्षा बजेट, काश्मीर, सीमोल्लंघन आणि पाक-सौदी अरबच्या संबधांवर पत्रकारांनी प्रश्न विचारले होते. मेजर जनरल इफ्तिखार त्यावर म्हणाले, भारताचा वाढता लष्करी खर्च आणि संरक्षण बजेटबद्दल पाकिस्तान चिंताग्रस्त आहे, पण कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तत्पर आहोत.
भारताचा संरक्षण खर्च आणि अर्थसंकल्प हा आमच्या तुलनेत पारंपारिक समतोलच्या विरुद्ध आहे. याकडे आंतरराष्ट्रीय समुदायानेही लक्ष दिले पाहिजे. पाकिस्तानमधील बरेच लोक म्हणतात की, पाकिस्तानचे संरक्षण बजेट खूप जास्त आहे. आम्ही बजेटचा १७ टक्के हिस्सा यावेळी सैन्य, नौदल आणि हवाई दलावर खर्च करीत आहोत आणि गेल्या १० वर्षांत पाकिस्तानचा संरक्षण खर्च सातत्याने कमी होत आहे. असे असूनही आमच्या क्षमता कमी झाल्या नसल्यामुळे राफेल आणू द्या किंवा एस -४०० आमची तयारी पूर्ण असल्याचे मेजर जनरल इफ्तिखार यांनी सांगितले.