अहमदनगर – अहमदनगर अर्बन बँकेत 3 कोटीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी भाजप नेते माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बँकेचे अधिकारी मारुती औटी यांनी तक्रार दिली आहे. माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगर अर्बन बँक घोटाळ्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. बँकेत कोट्यवधीचा गैरव्यवहार झालेला असून त्याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. या प्रकरणी प्रशासकीय यंत्रणांकडे हे सभासद पाठपुरावा करीत होते.
यासाठी प्रशासक यांच्या दालनामध्ये आंदोलन करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही दालनातून उठणार नाही, अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली. त्यानंतर बँकेचे प्रशासक एस. सी. मिश्रा यांनी कोट्यवधीचा अपहार केल्याप्रकरणी दोषी असणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश देऊन त्यासाठी बँकेचे शाखा अधिकारी मारुती औटी यांना प्राधिकृत केले. त्यानंतर औटी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे.