मुंबई: राजधानी दिल्लीमध्ये पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे ही बैठक काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीबाबत चर्चेसाठी होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. दिल्लीतील बैठकीबाबत मोठा गैरसमज पसरवण्यात आला. ही बैठक केवळ राजकीय विषयांवर नाही, तर देशातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती, असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर देशात काँग्रेसशिवाय पर्यायी शक्ती उभी राहण अशक्य असल्याचंही पवार म्हणाले.
देशात काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचा पर्यायाची चाचपणी सुरु आहे का? असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. त्यावेळी बोलताना “आघाडी म्हणून आम्ही आत्ता बसलो नाही, पण पर्यायी शक्ती उभी करायची असेल तर ती काँग्रेसला बरोबर घेऊनच करण्याची गरज आहे, असं माझं मत आहे. मी त्या बैठकीतही ते मांडलं. आघाडीचा चेहरा कोण असावं यावर सध्या आम्ही चर्चा केलेली नाही. पण मला वाटतं सामूहिक नेतृत्व हे सूत्र पुढं ठेऊन आम्हाला पुढे जावं लागेल,” असं पवार म्हणाले.
राष्ट्रवादी उभी राहणार देशमुखांच्या पाठीशी?
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रथमच भूमिका जाहीर करण्यात आली असून, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, “सीबीआय चौकशीत देशमुखांच्या विरुद्ध काही सापडत नाहीये, म्हणून त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहे. १० वर्षांपूर्वीची प्रकरणं बाहेर काढून, एफआयआर दाखल करायचा आणि छापेमारी करायची, मोठे आकडे टाकून भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. ज्या व्यक्तीने आरोप केले आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर यात किती तथ्य असावं याचं उत्तर मिळतं. त्यामुळे, केंद्रीय यंत्रणांचा अयोग्य वापर केला जात आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.
तसेच, “एवढ्या मोठ्या प्रमाणात यंत्रणेचा गैरवापर, हे भाजप स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे. मी आजपर्यंत देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात यंत्रणांचा गैरवापर आपल्या विरोधकांच्या विरोधात केलेला पाहिलेला नाही. देशात नेहमी विचारांचं राजकारण झालं आहे. जे काही विरोध होतात, मतभेद होते ते वैचारिक होते,” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हटलं आहे.